आपले संविधान भाग ६: संविधानाचे प्रास्ताविक
संविधानाचे प्रास्ताविक
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्र्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करीत आहोत.
भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची सुरवात "आम्ही भारताचे लोक..." अशी आहे. काय आहे याचा अर्थ? तर या संविधानातील जो काही संकल्प आहे, तो आम्ही भारतीयांनी केलेला आहे. तो आमच्यावर कोणीही लादलेला नाही. उद्याचा भारत सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य म्हणून आम्हाला घडवायचा आहे.
आम्ही भारताचे लोक या या प्रकारचा भारत घडवण्याचा आणि भारतातील नागरिकांना या या प्रकारचे अधिकार देण्याचा संकल्प करून हे संविधान स्वत:प्रत अर्पण करत आहोत. याचा आणखी एक अर्थ असा आहे की, भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना जे अधिकार बहाल केले आहेत, ते अधिकार आपल्याला कोणा राजा वा बादशहाने उदार होऊन दिलेले नाहीत; तर हे अधिकार म्हणजे आम्हा भारतीयांनीच एकमेकांच्या माणूसपणाला दिलेली मान्यता आहे. यातील क्रांतीकारी आशय नीट लक्षात घेऊन आपण भारतीयांनी एकमेकांसोबत जगण्याची आणि विकासाच्या दिशेने एकसाथ पुढे पुढे जाण्याची सवय आपल्याला लावून घेतली पाहिजे.
क्रमशः
संकलन-नुरखॉं पठाण
गोरेगाव-रायगड
Comments
Post a Comment